Friday, 17 August 2012

‘मी चोर आहे’ याला कॉग्रेस सरकारची असहमती

एक लाख 86 हजार कोटींचा खाण वाटप आणि पावणे दोन लाख कोटींचा टूजी स्पेक्ट्रम या उघडकीस आलेल्या घोटाळ्यांनी यूपीए सरकारचा बुरखा पूर्णपणे फाडला आहे, त्यामुळे सरकारने यावर कितीही पांघरुण घालायचा प्रयत्न केला तरी भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेले हात धूवून निघणार नाहीत. कॅगने सादर केलेल्या कोळसा खाणींच्या वाटपावरील अहवालाला सहमत नसल्याचे कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी सांगितले आहे. कॅगची अहवाल मांडणी ही पूर्ण अभ्यासकरित्या, पुराव्याधारित केलेली असते शिवाय चोर हा ‘मी चोर आहे’ याच्याशी कधीच सहमत नसतो हे सांगण्याची गरज नाही. त्यांना खरचं जर कॅगने खोटे आरोप केले आहेत हे सांगायचे असेल तर सारवासारव न करता तसे पुरावे सादर करावेत. यातल्या एकाच खाणीतला कोळसा काढला असल्याने सर्व खाणीतील कोळशाची बाजारभावाशी तुलना करता येणार नाही, हे कॉगेसचे म्हणणे खरे असले तरी तितकेच बिनबुडाचे आहे. याचा अर्थ म्हणजे आम्ही सरकारला या घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी सगळ्या खाणी रिकाम्या होण्याची वाट पहावी असे सरकारला वाटते का? लिलावाच्या धोरणाला भाजपशासित आणि डाव्या सरकारने विरोध दर्शविला म्हणून सरकारने 57 खाणीचे वाटप बिनबोभाट करण्याची शक्कल लढविली, परंतु नेहमीच आडकाठी घालणार्‍या ममता बॅनर्जीच्याबाबत सरकारला हे कधी हे सुचले नाही.
       देशात आर्थिक विकासदराची घसरण, अन्नधान्याचे बाजारातील वाढते दर, आसाममधल्या दंगली, रझा अकादमीने केलेला हल्ला, उघडकीस येत असलेले घोटाळे अशी एकाच वेळी वाहणारी आर्थिक आणि सामाजिक दहशतीची वादळे बघता सरकार देशाला कुठे घेऊन जात आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन स्वत:चे खिसे भरणे एवढेच काम या सरकारने चोखपणे बजाविले आहे. त्याची फळे त्यांना येत्या निवडणुकीत नक्कीच मिळतील याची शंका नाही.

Wednesday, 15 August 2012

आनंदाच झाडं


मुक्तांगण..व्यसनांच्या अधीन जाऊन स्वत:च्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत लावण्यासाठी इच्छुक व्यक्तींसाठीचे मनोविकास केंद्र. व्यवसायाने मानसोपचार तज्ञ असलेल्या सुनंदाताईंना पुण्यात प्रॅक्टीस करत असताना वस्तींमधील व्यसनामुळे होणारी भांडणे, कौटुंबिक वाद याचे अनुभव येत होते. तेव्हा एकदा लागलेले व्यसन कसे सोडविता येईल या भुंग्याने त्यांना पोखरण्यास सुरुवात केली. त्यातूनच 1986 साली त्यांनी येरवडा तुरुंगाच्या परिसरात मुक्तांगणचे व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले. जसाजसा कामाचा विकास होत गेला तसतसे अधिक जागेची गरज भासू लागली त्यातूनच विश्रांतवाडी येथे ‘मुक्तांगण मैत्री’ ची वास्तू उभी राहिली.  
आवारात शिरताच दगडी बांधकामाची मोठी इमारत दृष्टीस पडते. या इमारतीचा प्रत्येक भाग हा विशिष्ट हेतूने बांधला गेला आहे. इथे लोकांना ते एक बंदिस्त इस्पितळ न वाटता स्वत:चे घर वाटावे हा या मागचा मुख्य हेतू. येथे दाखल होणार्‍या व्यक्तींचा वयोगट अगदी सतरा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचा आहे. विशेष म्हणजे व्यसन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दारु, सिगरेट, चरस, गांजा हीच प्रामुख्याने येतात, पण इथे आल्यावर आज ज्याच्या भोवती सारे जग फिरते त्या इंटरनेटच्या व्यसनामुळे दाखल झालेले लोक पाहून व्यसन कशाला म्हणावे असा गोंधळ माझ्या मनात सुरु झाला. कोणतीही गोष्ट, सवय ही न केल्याने आपले मन खूप काळ विचलित राहत असेल आणि ती करण्यासाठी आपण काहीही करत असू तर ते एक प्रकारचे व्यसनच आहे, अशी व्यसनाची खरी व्याख्या मला इथे कळली. ती गोष्ट किंवा सवय मोबाईल वरील एसमएस ते जेवणानंतर खाण्यात येणार्‍या लंवगे इतकी साधीही असू शकते. मुळात अशा सवयी इतक्या नकळत आपल्याला लागलेल्या असतात की हे ही ‘व्यसनच’ आहे हेच आपल्या लक्षात येत नाही.
मुक्तांगणमध्ये महिन्याचे वेळापत्रक ठरलेले आहे. महिन्याच्या दर बुधवारी साधारणत: वीस ते पंचवीस नवीन पेशंटची दाखल केले जातात. त्याआधी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष येथे विनामूल्य नोंदणी केली जाते. दाखल करण्याआधी ओपीडी मध्ये पेशंटची तपासणी केली जाते, यावरुन त्याला दाखल करुन घेण्याची गरज आहे का हे ठरवले जाते. महिन्याच्या दर मंगळवारी कुटंब भेटीचा कार्यक्रम असतो. यात घरापासून दूर राहिलेल्या पेशंटला नातेवाईक भेटायला असतात, ज्यामुळे पेशंट आणि कुटंब यांच्यातील संबंध सुधारण्यास मदत होते. महिन्याच्या दर सोमवारी ज्यांचा कालावाधी संपला आहे त्या पेशंटला दहीसाखर देऊन निरोप दिला जातो. या कार्यक्रमाला अंतरदीप म्हटले जाते. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जुन्या पेशंटचे एकत्र मिळून वाढदिवस साजरा केला जातो.
पेशंटला कमीतकमी एका महिन्यासाठी पांढरे कपडे, योगाचे कपडे, साध्या कपडयांचे दोन जोड, चपला, रुमाल अशा कमीतकमी सामान घेऊन दाखल केले जाते. पेशंटच्या तब्बेतीनुसार हा काळ वाढविलाही जातो. पेशंट दाखल होण्यासाठी तयार असला पाहिजे ही प्रमुख अट असते. यासाठी दर बुधवारी तयार होत नसलेल्या पेशंटचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक असतात. पेशंटला दाखल केल्यापासून चार आठवडयाचा कार्यक्रम ठरलेला असतो. या काळात सुरुवातीपासूनच व्यक्तीचे व्यसन हे पूर्णपणे बंद केले जाते तसेच त्यामुळे आक्रमक झालेल्या पेशंटचीही काळजी घेतली जाते. या दरम्यान पेशंटच्या त्रासाने वैतागलेल्या पेशंटच्या पत्नीचीही सभा घेतली जाते, त्यात तिच्या व्यथाही समजून घेण्यात येतात. पेशंट इथून घरी गेल्यानंतर कुटुंबाचे सहकार्य कसे मिळाले पाहिजे हे सांगण्यात येते.
इथून बाहेर पडलेल्या पेशंटचा पाठपुरावा ठेवण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी मुक्तांगणची केंद्रे आहेत. 31 डिसेंबर आणि गटारी या दिवशी बाह्य वातावरणामुळे पेशंट पुन्हा व्यसन घेण्यास प्रवृत्त होऊ नये यासाठी त्यांना मुक्तांगणमध्ये बोलाविले जाते. या दिवसांत त्यांच्यासाठी येथे खेळ, नाटक अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
व्यसन ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. त्यामुळे पेशंट पुन्हा व्यसनाच्या मार्गाने जाण्याची शक्यता मोठया प्रमाणावर आहे, त्यासाठी त्याला ह्या सर्वापासून दूर राहण्यास सतत उत्तेजन द्यावे लागते. ते काम येथे काम करणारे अनेक लोक नेमाने करत असतात.
सुनंदाताई आणि अनिल अवचट यांनी पंचवीश वर्षापूर्वी लावलेल हे आनंदाच झाडं आज खूप बहरलं आहे. आज ते बघायला सुनंदाताई नसल्या तरी या झाडाच्या अंगणात विसावा घेऊन बाहेर पडणार्‍या पेशंटच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहर्‍यावरील आनंद त्या नक्कीच बघत असतील.