Friday, 17 August 2012

‘मी चोर आहे’ याला कॉग्रेस सरकारची असहमती

एक लाख 86 हजार कोटींचा खाण वाटप आणि पावणे दोन लाख कोटींचा टूजी स्पेक्ट्रम या उघडकीस आलेल्या घोटाळ्यांनी यूपीए सरकारचा बुरखा पूर्णपणे फाडला आहे, त्यामुळे सरकारने यावर कितीही पांघरुण घालायचा प्रयत्न केला तरी भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेले हात धूवून निघणार नाहीत. कॅगने सादर केलेल्या कोळसा खाणींच्या वाटपावरील अहवालाला सहमत नसल्याचे कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी सांगितले आहे. कॅगची अहवाल मांडणी ही पूर्ण अभ्यासकरित्या, पुराव्याधारित केलेली असते शिवाय चोर हा ‘मी चोर आहे’ याच्याशी कधीच सहमत नसतो हे सांगण्याची गरज नाही. त्यांना खरचं जर कॅगने खोटे आरोप केले आहेत हे सांगायचे असेल तर सारवासारव न करता तसे पुरावे सादर करावेत. यातल्या एकाच खाणीतला कोळसा काढला असल्याने सर्व खाणीतील कोळशाची बाजारभावाशी तुलना करता येणार नाही, हे कॉगेसचे म्हणणे खरे असले तरी तितकेच बिनबुडाचे आहे. याचा अर्थ म्हणजे आम्ही सरकारला या घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी सगळ्या खाणी रिकाम्या होण्याची वाट पहावी असे सरकारला वाटते का? लिलावाच्या धोरणाला भाजपशासित आणि डाव्या सरकारने विरोध दर्शविला म्हणून सरकारने 57 खाणीचे वाटप बिनबोभाट करण्याची शक्कल लढविली, परंतु नेहमीच आडकाठी घालणार्‍या ममता बॅनर्जीच्याबाबत सरकारला हे कधी हे सुचले नाही.
       देशात आर्थिक विकासदराची घसरण, अन्नधान्याचे बाजारातील वाढते दर, आसाममधल्या दंगली, रझा अकादमीने केलेला हल्ला, उघडकीस येत असलेले घोटाळे अशी एकाच वेळी वाहणारी आर्थिक आणि सामाजिक दहशतीची वादळे बघता सरकार देशाला कुठे घेऊन जात आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन स्वत:चे खिसे भरणे एवढेच काम या सरकारने चोखपणे बजाविले आहे. त्याची फळे त्यांना येत्या निवडणुकीत नक्कीच मिळतील याची शंका नाही.

No comments:

Post a Comment