‘न्यूटनचे नियम का लक्षात
ठेवायचे, अणू-रेणूची रचना का समजून घ्यायची, वर्गमूळ, इंटिग्रेशन - डेरिव्हेशन
याचा काय उपयोग, टुंड्रा देशात काय पिकते हे मला काय करायचे’ शाळा-कॉलेजात
असताना (न समजणारा अभ्यास करताना) मला पडलेले हे प्रश्न जवळजवळ आपल्या सगळ्यांनाच
पडले असतील किंवा पडत असतील. काहींना कालांतराने त्यांची उत्तरे मिळालीही असतील,
काहींना मिळाली नसतील तर काहींनी हे करावेच लागते असे मानून अशाप्रकारचे प्रश्न
पडणेच थांबविले असेल. असे प्रश्न का बरे पडतात, याचा बारकाईने विचार केला तर
आपल्या लक्षात येईल आपले शिकणे आणि जगणे हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आयुष्याची
पहिली पंचवीस वर्षे फक्त शिकत राहायचे. त्यानंतर उरलेले आयुष्य फक्त जगत राहायचे,
असे आपली शिक्षणपद्धती शिकवते.
याच शिक्षणपद्धतीत निखिलेश बागडेही शिकला. निखिल दहावीत जेमतेम
गुण मिळवल्यानंतर अकरावीला इतरांसारखाच सायन्सकडे वळला. गणिताची आवड असलेल्या
निखिलला अकरावीत गणितात ९८ गुण होते मात्र जीवशास्त्रात २ गुण! त्याचवेळी त्याला आटीआयची संधी मिळाली व त्याने अकरावी अर्ध्यात सोडून तिकडे
प्रवेश घेतला. तीन वर्षाच्या कोर्सनंतर त्याला नोकरीची संधी होती. पण आपण पुढे
शिकले पाहिजे या जिद्दीने त्याने बारावीची परिक्षा दिली आणि उत्तम गुणांनी पासही
झाला. (या वेळी जीवशास्त्र सोडून भूशास्त्र घेतले). पुढे त्याने पुण्यातल्या
पीआयसीटी कॉलेजातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयात इंजिनियरिंग पूर्ण
केले. इंजिनियरिंग करताना आणि केल्यावरही तो फारसा समाधानी नव्हता. निखिल सांगतो,
मी काय नाही केले पाहिजे हे कळायला लागले होते, पण काय करायला पाहिजे हे मात्र
उमगत नव्हते. आयबीएमच्या इंटरव्ह्यूत त्याला ‘तुम्हाला पुढे काय
करावेसे वाटते?’ असा प्रश्न विचारला होता. यावर निखिलचे उत्तर होते, ‘आता जर्नालिझम
करावसं वाटतयं’. अशी खरी उत्तरे देऊनही त्याची सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या कॉग्नीझंट या
नामांकित कंपनीत निवड झाली. कोडींग, अल्गोरिदम त्याला आवडायचे, पण आपल्या कामाचा
खर्या अर्थाने उपयोग काय हेच समजत नव्हते. त्यामुळे कामात समाधान मिळत नव्हते. ट्रेकिंगची
पॅशन, नाटक – कविता अशा लिखाणकामाची आवड असणार्या, निसर्गात रमणार्या निखिलला या
जगात आपले काहीतरी हरवले आहे, असेच वाटायचे. त्याच्याच कवितेच्या भाषेत सांगायचे
तर,
“Something is missing, left behind
Life is one way, it
doesn't rewind
Lots of questions,
confused mind
Where is the answer,
Let me find…”
दरम्यानच्या काळात तो अहमदनगरच्या सावलीतील (निराधार मुलांसाठी
काम करणारी संस्था) मुलांसोबत काही खेळ, उपक्रम घ्यायचा. हे काम करताना आपण समाजातल्या
वरवरच्या समस्यांवर काम करत आहोत. मूळ प्रश्न शोधून त्यावर काम करण्याची गरज आहे,
हे निखिलला हळूहळू जाणवायला लागले. एकदम कामात न उतरता समाजाची रचना, गरज समजून
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करावे यासाठी त्याने मुंबईच्या
आयआयटीतला ‘सितारा’ (CTARA- Center For Technology Alternative For Rural Areas) या पदव्युत्तर कोर्सला प्रवेश घेतला. याचवेळी तो ‘निर्माण’ युवा चळवळीत
सहभागी झाला.
सीतारामधून बाहेर
पडल्यानंतर त्याने बायफ संस्थेच्या ‘शिक्षण मित्र’ या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. हा प्रकल्प आश्रम शाळांमध्ये शिकणार्या
आदिवासी मुलांचे शिक्षण त्यांच्या जगण्याशी जोडणे. तसेच आश्रम शाळांच्या विकासातून
गावाचा विकास करणे, या उद्देश्याने २००३ साली बायफने नंदुरबार जिल्ह्यात सुरु
केला. शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यावर आश्रम शाळांमधील बहुतेक मुले ही त्यांच्या
पारंपारिक शेती व्यवसायाकडे वळतात. त्यामुळे दहा-बारा वर्षे घेतलेले पाठयपुस्तकीय
शिक्षण त्यांना पुढच्या आयुष्यात उपयोगात आणता येत नाही. तसेच दर्जेदार शिक्षणाच्या
अभावामुळे बाहेरील स्पर्धेच्या जगात स्थानही मिळवता येत नाही. असे हे विचित्र कोडे
या मुलांनाच कसे सोडविता येईल, हे आव्हान स्वीकारुन २०१० साली निखिल नंदुरबार
जिल्ह्यात दाखल झाला.
या प्रकल्पातंर्गत शाळेच्या तासांमध्ये अजून एका तासाची भर
नक्कीच करायची नव्हती, पण मग मुलांसोबत काम कसे करणार हा त्याच्यापुढील खूप मोठा
प्रश्न होता. सुरुवातीच्या टप्प्यात शाळा आणि मुलांशी तोंडओळख होण्यासाठी शाळेच्या
मोकळ्या तासाला, मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर मुलांसोबत काही उपक्रम, खेळ
घेतले. कोणतीही नवीन गोष्ट शाळेत आली की, आपले काम वाढले याच मानसिकतेने शिक्षक
त्याचा स्वीकार करतात. हा अनुभव निखिललाही आला. उपक्रम निवडताना मुलांची शाळेची
वेळ, आवड, सहभाग, शिक्षकांचा दृष्टीकोन, शाळेची भौगोलिक स्थिती या सर्व बाबींचा
काळजीपूर्वक विचार केला गेला. हे उपक्रम मुख्यत: शेती, आरोग्य व सामाजिक
जाणीव याच्याशी निगडीत आहेत. शेतीअंतर्गत उपक्रमांत शाळेच्या आवारातच मुले परसबाग,
फळबागा, फुलबागा, रोपवाटिका, वनऔषधी, वनझाडे यांची लागवड करतात. तसेच गांडूळ खत,
कंपोस्ट खत ही तयार करतात. यासाठी निसर्गाशी सुसंगत असलेल्या शेतीतंत्रज्ञानाची
माहीती घेऊन उपयोगात आणतात. संसर्गजन्य व पाण्यातून पसरणार्या रोगापासून स्वत:चे संरक्षण कसे
करावे, पाणी शुदधीकरणाच्या पद्धती, हात धुण्याच्या पद्धत या सारखे आरोग्याशी
निगडीत उपक्रम घेतले जातात. सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी बँक, पोलिस स्टेशन
यासारख्या सरकारी संस्थाना भेटी देतात. मुलांची जीवनकौशल्ये विकसित व्हावीत, व्यवहारज्ञान
वाढावे तसेच शाळेबाहेरील जगाशी परिचय होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा, याच हेतूने
या उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.